Monday, June 6, 2016

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)


असुर सूर्य : असुर संस्कृती

Posted: 05 Jun 2016 10:17 PM PDT

- संजय सोनवणी
'साहित्य चपराक' जून २०१६ 

जगातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती? देवांची का असुरांची? असुर संस्कृती जवळपास अर्धे जग व्यापलेली संस्कृती होती याचे निर्णायक पुरावे आपल्या हाती आहेत. तुलनेने देव-संस्कृती अर्वाचिन. ब्राह्मण ग्रंथातही असुर व देव हे प्रजापतीचीच अपत्ये असून असुर थोरले असे स्पष्ट निर्देशीले आहे. ऋग्वैदिक देवता वरुण, अग्नी, इंद्रादि यांना आरंभीच्या ऋग्वेद काळात आदरार्थी देव नव्हे तर असुर हे संबोधन वापरलेले आहे; पण असुर संस्कृतीची पुरातनता पाहायला आपल्याला फक्त ऋग्वेद अथवा पुराणांवर अवलंबून राहण्याचे कारण नाही. पारशी धर्मग्रंथ अवेस्ता ते असिरिया भागातील अवशेष व त्यांचे इष्टिकालेख आपल्याला आता पुरावा म्हणून उपलब्ध आहेत. त्यावरून आपण असुर संस्कृतीच्या पुरानत्वाची आणि व्यापकतेची माहिती घेऊ शकतो. आज भारतात तरी असुर ही संज्ञा अत्यंत बदनाम झालेली असून पुराणातील असुरांच्या मूळ कथांचे विकृतीकरण केले गेल्याने आज असुर म्हटले की दुष्ट, मायावी, मनुष्यघातकी, नरभक्षक इ. वाईट बाबीच मनात येतात; पण आपण पुरातन वास्तव पाहिले तर मात्र आश्चर्याचा धक्का बसल्याखेरीज राहणार नाही. वस्तुत: असुर संस्कृतीची व्याप्ती भारत, पर्शिया (इराण-अफगाणिस्तान) ते सुदूर मेसोपोटेमिया व इजिप्त येथवर असल्याचे स्पष्ट पुराव्यांनिशी दिसून येते.

असिरियन संस्कृती (असुरांची संस्कृती) ही मुळातच अस्सूर (अशुर/अशिर) या शब्दापासून बनली आहे. अस्सुर शहर हे टायग्रिस नदीच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेले होते. त्याचे अवशेष आजही इराकमध्ये पाहायला मिळतात. हे शहर इ. स. पू. 2600 मध्ये वसवले गेले. अस्सुर ही या नगराचीच नव्हे तर असिरियन लोकांची प्रमुख देवता होती. असिरियन राजांच्या नावातही असुर हा शब्द सामाविष्ट असे. जसे असुर बनीपाल, पुझुर असुर, असुर उबालित, अशुर निरारी वगैरे. असुर ही असिरियनांची मुख्य देवता होती व राजा हा असुराचा प्रतिनिधी म्हणून राज्य करत असे. म्हणजे खरा राजा असुरच (म्हणजे सूर्य) आहे व त्याच्यातर्फे मानवी व्यक्ती राज्य करते अशी संकल्पना असिरियनांची होती.


असुर म्हणजे सूर्यदेवता. किंबहुना सूर्यालाच असिरियन असुर असे म्हणत असेही स्पष्ट दिसते. असुर देवतेच्या प्रतिमांतही पंख पसरलेली सूर्य देवताच दर्शवली जाते. तो असिरियन पुराणकथांत देवांचा देव आहे, पर्वताचाही देव आहे आणि असुर शहराचाही देव आहे. याच्या सन्मानार्थ असिरियात अनेक मंदिरे बांधली गेली. अगदी ख्रिश्‍चन काळातही असिरियनांनी असुरपूजा सोडली नाही. 


असुराबरोबरच असिरियन लोक अन्य देवताही पुजायचे. किंबहुना प्रत्येक शहराची स्वतंत्र नगरदेवता असायची, जसे आपल्याकडे आजही प्रत्येक गावाला व नगराला गावदेव अथवा गावदेवी असते तसेच. या देवतांत अनू, बल, एन्लिल, इश्तार, नाना (सिन) वगैरे देवता होत्या. एका अर्थाने एक मुख्य देवता मानत बहुदेवतावादही असिरियन देवतात होता असे स्पष्ट दिसते. असिरियन साम्राज्य सत्ताधारी वंश बदलत गेले असले तरी इसवी सनाच्या सातव्या शतकापर्यंत टिकले.


इजिप्तमधील ओसिरिस (ओसायरिस, औसिर, असिरी) ही परिवर्तन, पुनरुत्थान, जन्म आणि मृत्युची देवता मानली जाते. अगदी आपल्या शिवासारखीच. असुर या शब्दाचेच हे इजिप्शियन भाषेतील रुप आहे. ओसिरिसला आकाश, भूमी किंवा सूर्यदेवताराचे अपत्य मानले जाते हेही येथे उल्लेखनीय आहे.


असुर आणि सूर्य यातील संबंध येथे आपल्या लक्षात आला असेलच. असिरियनांसाठी असुर हा सूर्यच आहे तर काही इजिप्शियन पुराणकथांनुसार तो सूर्यपुत्र आहे. हे साम्य येथेच संपत नाही. ऋग्वेदानुसारही असुर हे सूर्याचेच एक नाव आहे. खालील ऋचा पहा:


पश्यन्नन्यस्या अतिथिं वयाया रतस्य धाम वि मिमेपुरूणि।
शंसामि पित्रे असुराय शेवमयज्ञियाद्यज्ञियं भागमेमि॥
(ऋ. 10.124.3)
दविधा सूनवो असुरं सवर्विदमास्थापयन्त तर्तीयेनकर्मणा।
सवां परजां पितरः पित्र्यं सह आवरेष्वदधुस्तन्तुमाततम॥ 
(ऋ. 10.56.6)
उक्षा समुद्रो अरुषः सुपर्णः पूर्वस्य योनिम पितुर आ विवेश।
मध्ये दिवो निहितः पर्श्निर अश्मा वि चक्रमे रजसस पात्य अन्तौ॥
(ऋ. 5.47.3)
पतंगमक्तमसुरस्य मायया हर्दा पश्यन्ति मनसाविपश्चितः।
समुद्रे अन्तः कवयो वि चक्षते मरीचीनाम्पदमिछन्ति वेधसः।
(ऋ. 10.177.1)


या ऋचा व ऋग्वेदात विखुरलेले अन्य संदर्भ यावरुन लक्षात येते की वैदिकांच्या दृष्टीनेही असुर ही मुळची सूर्यदेवताच होती किंवा सूर्यालाच ते असुरही म्हणत असत. असुर देवता निर्मितीचे कारण तर होतीच; पण स्वर्गस्थान व अंतरिक्षही असुरांशीच निगडित होते. वैदिक साहित्यात असुर वीरांना 'स्वर्गाची मुले' म्हटले गेले आहे.  असुर आणि सवितृ यांचे सोन्याच्या हातांचे असे वर्णन 1.35.9-10 या ऋचांमध्ये करण्यात आले असून सवितृ हे सूर्याचेच एक नाव आहे हे आपल्याला माहीत आहे व अनेक ठिकाणी सवितृलाही असुर हे संबोधन वापरले गेलेले आहे. असुर हे सूर्यपूजक होते असे 10.177 या ऋचेवरुन एस. कल्याणरमणही म्हणतात. असुर हे समाज म्हणून सूर्यपूजक व असुर हे संबोधन म्हणून सूर्यनिर्देशक असाच याचा अर्थ दिसतो. पतंग हा शब्द येथे सूर्याचे नाव म्हणून वापरला आहे. ऋग्वेदात सूर्याला अनेक नावे असली तरी सुपर्ण असेही एक नाव आहे व ही नावे असुरांकडेच निर्देश करतात असे डॉ. मालती शेंडगे यांनी सप्रमाण दर्शविले आहे. 


वैदिक साहित्यात सूर्यालाच असुर म्हटले जात होते हे वाचून धक्का बसणे स्वाभाविक आहे; पण हे एवढ्यापुरते मर्यादित नाही. वैदिकांनी नंतर असुरांना बदनाम करण्याची मोहीम काढली असली तरी त्याची कारणे सर्वस्वी सांस्कृतिक/धार्मिक संघर्षात आहेत; पण आरंभीचा वैदिक धर्म हाही असुरकेंद्रितच होता हे वरुण-इंद्रादि देवतांना आरंभी 'असुर' हे संबोधन आदरार्थाने वापरले आहे यावरून सिद्ध होते.


अहुर माझ्दा (सं. असुर-मेधा) हा झरथुस्ट्री धर्माचाही एकमात्र ईश्वर. देव हे या धर्मात दुष्ट, पापी मानले जातात. अहुर हे असुर शब्दाचे पर्शियन रुप होय. अहुर माझ्दा हा विश्वनिर्माता व वैश्विक न्यायाचा रक्षणकर्ता असून त्याचा सर्वसाधारण शब्दश: अर्थ उच्चबुद्धिमत्तेचा, शक्तीशाली असा घेतला जातो. अहुर माझ्दाच्या धर्माची पुनर्स्थापना झरथुस्ट्राने उत्तर अफगाणिस्तानात ऋग्वेदाच्या समकालीन (इसपू 1500) केली. म्हणजे झरथुस्ट्राच्या पूर्वीही हा धर्म होताच परंतु त्यात अनेक अपप्रथा घुसल्या होत्या. त्या दूर करत झरथुस्ट्राने संदेष्ट्याच्या भूमिकेत जात अहुर माझ्द्याचा खरा धर्म लोकांना सांगायला सुरुवात केली. यात अहूर माझ्दा हा श्रेष्ठ ईश्वर असून ते सूर्याचेच एक नाव आहे. जरथुस्ट्री धर्मात प्रार्थना या अग्नी (सूर्याचेच एक रुप) किंवा सूर्यासमक्षच म्हटल्या जातात. झुर्वेनाइट ही झरथुस्ट्री धर्माचीच एक शाखा आहे. ही शाखा सूर्यालाच अहुर-माझ्द म्हणते. एवढेच काय पण खोतानी शक हेही अपभ्रंशित रुपात सूर्याला अऊरमाझ्दे म्हणतात. आजही अनेक इराणी बोलीभाषांत सूर्याला ओर्मोझ्द असेच म्हटले जाते हे झरथुस्ट्री धर्माच्या प्रकांड अभ्यासिका मेरी जोइस यांनी दाखवून दिलेले आहे. (इेूलश, चरीू (1983), Aर्हीीर चरूव, एपलूलश्रेरिशवळर खीरपळलर 1, छशु धेीज्ञ: र्ठेीींश्रशवसश  घशसरप झर्रीश्र, िि. 684-687)
असुरांसंबधी अन्य विवेचन करण्याआधी हे विवेचन अत्यंत महत्त्वाचे वाटल्याने आधीच केले आहे. असुर आणि सूर्य यातील अन्योन्य संबंध वाचकांच्या लक्षात एव्हाना आलाच असेल. असुर म्हणवनारे लोक हे भारत ते मेसोपोटेमियापर्यंत पसरलेले होते. असुर हीच त्यांची मुख्य देवता होती. असुर हे सूर्याचेच संबोधन होते. सूर्य हा मानवी जगाचा आदिम काळापासून केंद्रबिंदू असणे स्वाभाविक आहे. काही समाजांनी आपल्या दैवत रचनेत त्यालाच केंद्रवर्ती स्थान दिल्याने त्याच्या भवती जी संस्कृती केंद्रित झाली तीच असुर संस्कृती होय.


सूर्य हा तत्कालिन जगाने अत्यंत गूढमय, रहस्यमय दृष्टीने पाहिला असल्यास नवल नाही. दिवस आणि रात्र ही विभागणी चांगले आणि वाईट याप्रमाणे करत आरंभिक कल्पना तेवढ्याच गूढ पद्धतीने विकसित केल्या जाणे स्वाभाविक होते. असुर या शब्दाची वैदिक व्युत्पत्ती असू: म्हणजे प्राणवान-वीर्यवान या शब्दाला 'र' हा प्रत्यय लागून असुर शब्द बनतो असे संस्कृततज्ज्ञ म्हणतात. असुर शब्दाचा खरा अर्थ प्राणवान, वीर्यवान, पराक्रमी असा आहे हे भारतीय संस्कृती कोश (खंड 1, पृ. 337) मध्ये सांगितले आहे परंतु ही व्युत्पत्ती कृत्रिम आहे हे उघड आहे. कारण असिरियन संस्कृतीची भाषा ही सेमेटिक गटातील आहे. या भाषेचा कथित इंडो-युरोपियन भाषांशी काहीही संबंध नाही. असुर, अस्सुर, अशुर, अशेर हे शब्द मानवाच्या आदिम भाषेतील आद्य शब्दसमुहांपैकी एक असले पाहिजेत ज्यांचा भाषागटांशी काहीएक संबंध नाही. डॉ. आ. ह. साळूंखेही असुर शब्दाची व्युत्पत्ती अन्य भाषांतच शोधली पाहिजे असे बळीवंशमध्ये म्हणतात. त्यामुळे असिरियन (अक्काडियन) लोक भारतात आले व त्यांनी सिंधू संस्कृती वसवली किंवा सिंधू लोकांनी असिरियन संस्कृती वसवली असे काही विद्वान (उदा. मालती शेंडगे, रा. ना. दांडेकर) प्रतिपादित करतात त्यात अर्थ नाही. सूर्याला कोणीतरी आधी असुर म्हणाले आणि तो शब्द विविध टोळ्यांत संक्रमित झाला व काही टोळ्यांनी सूर्यकेंद्रित असुर संस्कृत्या जोपासल्या एवढेच फारतर येथे म्हणता येईल. कोणतीही संस्कृती उदयाला आली की, ती विरोधात अथवा स्वतंत्रपणे इतरही संस्कृत्या निर्माण होतात. असुर धर्म आणि वैदिकांचा देव धर्म यात कशी फूट पडली त्यावरून आपल्या लक्षात येईलच. पुढे ऋग्वेदातच असुर हे मुख्य देवतांचे संबोधन गळून पडते आणि असुर हा शब्द कटाक्षाने केवळ शत्रुंसाठी वापरला जावू लागतो. हा सांस्कृतिक संघर्ष आपण पुढे समजावून घेऊ. अहुरमाझ्दा धर्मात असुर हे सृष्ट तर देव हे दुष्ट आहेत हे आपल्याला माहीत आहेच.


किंबहुना सूर्य हा वैदिक शब्द मूळच्या असुर या शब्दावरुनच साधला गेला असावा हे असुर आणि सूर्यामधील अभेदावरून दिसून येते. मग असूर्यचे सूर्य कसे झाले? त्याचे कारण पुरातन सांस्कृतिक संघर्षात आहे. असुरांच्या विरोधात सुर हा शब्द देवासुरांतील झगड्यामुळे निर्माण केला गेला. सुर हा शब्द संस्कृतात कृत्रिम व नंतरचा असून असुर हाच मूळचा शब्द आहे, असुर शब्दातील 'अ' हा नकारार्थी नसून असू: या शब्दाला 'र' हा प्रत्यय लागून तो शब्द बनला आहे असे डॉ. रा. ना. दांडेकर (वैदिक देवतांचे अभिनवदर्शन, पृ. 43-46) म्हणतात. सूर्य जर सूर या शब्दापासून बनवला गेला असेल तर असूर्य हाच शब्द मुळचा असायला हवा. असुर हा शब्दच मुळात सूर्यवाचक आहे हे आपण पाहिलेच आहे. असूर्य शब्द ऋग्वेदात वेगळ्या संदर्भात, म्हणजे असुरांचे स्थान दाखवण्यासाठी (ऋ. 7.21.7) वापरला गेला आहे हेही महत्त्वाचे आहे. ती ऋचा अशी-


देवाश्चित ते असुर्याय पूर्वे.अनु कषत्राय ममिरे सहांसि ।
इन्द्रो मघानि दयते विषह्येन्द्रं वाजस्य जोहुवन्त सातौ ॥


येथे देव हे पूर्वीचे असुर या अर्थाने घेतले आहेत. देवांनाच पूर्वी असुर म्हटले जायचे याचे भान या ऋचेत दिसते. देव हा शब्दही दिव किंवा द्यौस या शब्दातून आला आहे. त्याचाही अर्थ प्रकाश अथवा सूर्य असाच होतो हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे असुरांशी संघर्ष करणार्‍या गणांनी असुर हे नाव टाकत देव हे नाव स्वीकारले खरे पण मुळबोध कायम ठेवला हेच तेथे सुचित होते.
येथे लक्षात घायची बाब म्हणजे आपण मानतो त्याप्रमाणे असुर हा शब्द अवमानदर्शक नाही. तो सूर्यनिदर्शक आहे. मानवाला तेजोमान सूर्य पवित्र, यातुमय, गुढ, जीवनदाता, धीर देणारा, अंधाराला (म्हणजेच अनिष्टलाही) दूर करणारा वाटला नसला तर नवल नाही. हा शब्द (असुर अथवा सूर्य) मूळचा वैदिक नाही. हा शब्द आदिम शब्दसमुहांपैकी एक असून स्थानिक उच्चारपद्धतींप्रमाणे वेगवेगळा जसा उच्चारला जात असे तशाच त्याभोवतीच्या पुराणकथाही वेगवेगळ्या बनल्या असे दिसते. हा शब्द मूळचा अक्काडियन भाषेतील असावा असा डॉ. मालती शेंडगे यांचा कयास आहे तर डॉ. आ. ह. साळूंखे सुचवतात की, असुरांच्या संस्कृतेतर भाषेतच या शब्दाचे मूळ शोधले पाहिजे.


सिंधू संस्कृतीचे लोक आणि मेसोपोटेमियात पुरातन कालापासून व्यापारानिमित्त संबंध होता तसाच तो प्राचीन इराणशीही होता. व्यापारी वस्तुविनिमय जसा दोन संस्कृत्यांत होतो तसाच तो काही शब्द व सांस्कृतिक/धार्मिक संकल्पनांतही होत असतो. त्यामुळे शब्द एका ठिकाणावरुन दुसरीकडे गेला असा अंदाज बांधता येईल; पण कोठून कोठे हा प्रवास झाला हे मात्र सांगता येणार नाही. शिवाय सूर्याचा परिचय मानवी समाजाला लाखो वर्षांपूर्वीच झाला असल्याने त्याला विविध प्रदेशांतील मानवाने काहीना काही नाव दिले असणार व ते प्रचारित झाले असणार हेही तेवढेच खरे. त्यामुळे त्याचे मूळ शोधण्यापेक्षा असुर म्हणजे मूलत: सूर्य एवढे समजावून घेतले तरी असूरांकडे पाहायचा दृष्टिकोन आमुलाग्र बदलायला मदत होईल एवढे नक्की! सिंधू संस्कृतीतील मुद्रांवर सूर्याचे चित्रण केले गेले आहे हेही येथे उल्लेखनीय आहे. सिंधू संस्कृती ही मूळ असुरांची संस्कृती. ते वास्तुकलेत निष्णात होते. या स्मृती मयासुराच्या रुपात पुढेही जपल्या गेल्या.

असुर हे मानवही!


असुरांबाबत अनेक लोकभ्रम आज निर्माण झाले आहेत. असुर ही कोणी काल्पनिक, पुराणकथांनी रचलेली मित्थकथा नाही. असिरियन लोक मानवच होते हे तर स्पष्ट आहे. असुर हा शब्द जसा संबोधन म्हणून वापरला जातो तसाच समुहवाचकही वापरला जातो. असुर हे सूर्याचे जसे नाव होते तसे अनेक मानवी समुदायांचेही होते. प्रत्येक समुदायाची संस्कृती ही असूरकेंद्री असली तरी त्यात स्थानिक देवदेवतांनाही स्थान होते. काही असुर मूर्तीपूजक होते तर काही असुराची अर्चना अग्नीमार्फत  (यज्ञ - यस्न) करायचे. ऋग्वेदात अग्नीलाही अनेकदा असुर म्हटलेले आहे. त्वमग्ने रुद्रो असुर... असे तैत्तिरिय ब्राह्मणातही (3.11.2.2) म्हटलेले आहे. किंबहुना अग्नीला सूर्याच्याच समकक्ष मानण्याची धार्मिक प्रथा होती. भारतातील असुर मात्र लिंगपूजक अथवा शिव-शक्ती पूजक होते. परंतु सूर्याशी संबंधित काही प्रतीके मात्र शिवाशी जोडलेलीच राहिली. उदा. वृषभ, पर्वत, चंद्रकोर. (चंद्र सूर्यपुत्र आहे असा प्राचीन काळी समज होता.) 


या असुरांचा धर्म नेमका काय होता हे ऋग्वेद सांगत नाही. झरथुस्ट्री धर्माचे लोक मात्र वेगळ्या पद्धतीचा यज्ञधर्मच पाळत. जे असुर झरथुस्ट्राच्या धर्मात गेले नव्हते ते नेमका कोणता धर्म पाळत याचे विवेचन नसले तरी ऋग्वेदातील अकर्मन (कोणतेही कर्मकांड नसलेले), अब्रह्म (मंत्र नसलेले), अयज्वन, अयज्जु (यज्ञ नसलेले), अव्रत:, अन्यव्रत: (व्रत नसलेले, अन्य व्रत असलेले) असे उल्लेख दास-दस्युंबाबत मिळतात. सर्वात महत्त्वाचा उल्लेख आहे तो शिस्नदेव, म्हणजे लिंगाची उपासना करणारे. यांच्याबाबत तर प्रचंड द्वेष व्यक्त केला गेला आहे.  हे दास-दस्यू असुर संस्कृतीचाच भाग असल्याने ही वर्णने असुरांसाठीचीच आहेत असे म्हणता येईल. परंतु त्यातून सर्व असुरांच्या धर्माचा, धर्मतत्वांचा विशेष बोध होत नाही हेही तेवढेच खरे. तरीही आपल्याला झरथुस्ट्री धर्माची तत्त्वे व उपासनापद्धतीही माहीत आहेत. ती वैदिकांपेक्षा फारशी वेगळी नव्हती. याचे कारण असुर व देवांच्या विशिष्ट सांस्कृतिक इतिहासात दडलेले आहे. असुर व देव हे दोघेही प्रजापतीची संताने होत असे शतपथ ब्राह्मण सांगते. दोघांनाही यज्ञ हवा होता; पण देवांनी यज्ञ पळवला व जो अवशिष्ट वाईट भाग होता तो असुरांसाठी ठेवला अशी कथा येथे येते. झरथुस्ट्री धर्मातही यज्ञ होताच पण त्याला हिणवण्यासाठी हे कथा बनली हे उघड आहे; पण याचा दुसरा अर्थ असाही होतो की एके काळी दोन्ही (देव व असुरही) एकच धर्म पाळत असत. पुढे त्यांच्यात फुट पडली ते बहुदा झरथुस्ट्राने असुर धर्माला नवे स्वरुप द्यायला सुरुवात केल्यानंतर. त्यामुळे सुरुवातीला असूरकेंद्री असलेला वैदिक धर्म असुरविरोधी बनला.


शतपथ ब्राह्मणात अजून एक कथा येते (10.9.3.7-9) ती अशी. सौत्रामनी यज्ञ हा आधी असुरांचाच होता. तो नंतर देवांनी घेतला. म्हणजेच काही असुर घटकांचा कर्मकांडात्मक धर्म यज्ञाभोवती फिरत होता तर काहींचा अमुर्त देवतांभोवती तर काहींचा लिंगपुजा, वृक्षपुजा ते अन्य अनाम देवतांची पुजा या भोवती असे दिसते. त्यामुळे एक संस्कृती असली तरी सर्वांतच मैत्रही नव्हते आणि धर्मही एकच नव्हता.


आणि हे तत्कालीन स्थिती, भुगोलाचे ज्ञान, जनसंख्या आणि आपापसातील अनेक कारणांनी उद्भवणारे संघर्ष पाहता स्वाभाविकही होते. येथे एक लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे असुर जसे आदरार्थी इंश्वरी नाम/संबोधन आहे तसेच ते मानव समुहांचे व मानवाचेही नाव आहे. देव याला अपवाद नाही. देव हे एक समाजनामही होते हे लक्षात ठेवले पाहिजे.


येथे हे स्पष्टपणे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की ऋग्वेदातील असुर (देवता म्हणून उल्लेख असतील किंवा शत्रू म्हणून) हे भारतीय पुराणकथांतील असुर नव्हेत. वल, नमुची, शंबर, वृत्र इत्यादी जे असुर ऋग्वेदात शत्रू म्हणून उल्लेखले आहेत ते सर्वस्वी प्राचीन इराणमधील आहेत. त्यातील काही असुर (उदा. वृत्र) तर निसर्गाची रुपके आहेत. त्या देवासूर युद्धांचा आणि भारतातील असुरांचा त्यांच्याशी संबंध नाही; परंतु आपण आपला सांस्कृतिक इतिहास पाहताना कोणता मानवी समुदाय कोठला हे तपासले नसल्याने व कोणत्या पुराणकथा कोणत्या भौगोलिक क्षेत्रात रचल्या गेल्या याचा अदमास न घेतल्याने आपले आपल्याच इतिहासाबाबत पुष्कळ गैरसमज आहेत. असुर संस्कृतीच्या विस्ताराचाही आपल्याला अंदाज आला नाही. भारतातील असुरांबाबत आपल्याला जी माहिती मिळते ते पुराणांतून, महाभारतातून व काही प्रमाणात ब्राह्मण ग्रंथांवरून. त्यातही वैदिक पुराणकथांतून झिरपलेल्या कथा कोणत्या हेही समजावून घ्यावे लागते. या कथांवर अनेक पुटे शत्रुभावनेने चढवली गेली असली तरी त्यातून आपण भारतीय असुरांचा इतिहास शोधू शकतो. हा फरक का हे जोवर आपण ऋग्वेद व अवेस्त्याचा भूगोल समजावून घेत नाही तोवर समजणार नाही.


असे असले तरी असुर संस्कृती पुरातन असून तिला विरोध करण्यासाठी असंतुष्टांनी स्थापन केलेली संस्कृती म्हणजे देव संस्कृती. ही कधी आणि कोणी निर्माण केली हे आपण आज सांगू शकणार नाही; पण वैदिक संस्कृती या संस्कृतीचीही निर्माती नव्हे. वैदिक संस्कृती ही असुरांकडून विरोधी गटात, म्हणजेच देवांकडे कशी गेली याचा क्रमबद्ध वृत्तांत ऋग्वेदातच येतो.
झरथुस्ट्रानेही असुर धर्माचे पुनरुज्जीवन केले. त्याने नव्याने धर्म स्थापन केला नाही तर विस्कळीत धर्माला एकत्र करण्यासाठी नवे तत्त्वज्ञान रचले. झरथुस्ट्राच्या गाथांत झरथुस्ट्री धर्माआधीच्याही अनेक गाथा आहेत. त्या पारशी पंडितांनी संबोधने बदलून वापरल्या असे मेरी जोइस म्हणतात. म्हणजेच झरथुस्ट्री धर्म स्थापन होण्यापुर्वी खूप आधीपासून असुर संस्कृती व धर्म अस्तित्वात होताच. झरथुस्ट्राने देवांना दुष्ट व शत्रू मानले. देव हे वाईट, सर्व पापांचे मूळ. अंग्रमैन्यु (इंद्र) हा अहुर माझ्दाचा मुख्य शत्रू.


म्हणजेच देव (दिव/द्यौस) हा शब्दही अचानक उगवलेला नाही. देवांना मानणारे काही समाज होतेच व त्यांचेही वेगळे धर्म होते. कदाचित हा धर्म असुरांना विरोध करणार्‍या जनसमुहांनी शत्रुत्वातूनही निर्माण केला असू शकेल; पण या धर्माची निर्मिती वैदिकांनी केली नव्हती हे निश्चित. ऋग्वेदात आधी असुरत्त्व प्रामुख्याने येत असून वरुण, मित्र, अग्नी, सवितृ, रुद्र, आदित्य, पुषाण, आर्यमान व इंद्राला उद्देशून आदरार्थी संबोधन म्हणून असुर हा शब्द वापरला आहे. ऋग्वेदात 105 वेळा असुर शब्द येतो. त्यात 90 ठिकाणी त्याचा वापर पूजनीय/आदरणीय उपाधी म्हणून केला आहे. असुर उपाधी मात्र नंतर नाहीशी होते व असुर हे दुष्ट/मायावी म्हणून अवतरु लागतात. हा बदल झाला आहे त्यामागे इराणमधील विविध टोळ्यांतील संघर्ष व झरथुस्ट्री माझ्दायस्नी धर्माचे वाढलेले प्राबल्य व वैदिकांची झालेली पीछेहाट हे महत्त्वाचे कारण आहे. या संघर्षाचे प्रतिबिंब आपल्याला ब्राह्मण ग्रंथांत ठळकपणे दिसते. किंबहुना काही वैदिकांना भारतात शरणार्थी म्हणून का प्रवेश करावा लागला याचे कारण असुर धर्माच्या प्राबल्यात आहे. ब्राह्मण ग्रंथात देवासुरयुद्धांचे जे अतिरंजित वर्णन येते ते याच शत्रूभावनेतून हेही येथे लक्षात घ्यावे लागते.


पुरातन काळात सुष्ट व दुष्ट शक्तींना गूढत्व जसे दिले जायचे तसेच मानव आणि त्या शक्तींतील एक संबंधही रुपकात्मक गूढरम्यतेने जोपासला जायचा. पुरावाङ्मयात हा गुण (अथवा दोषही) ठळकपणे दिसतो. ऐतिहासिक घटना नोंदवतानाही अनेकदा प्राचीन ग्रंथांनी त्यांचे मिथकरुपानेच वर्णन केले आहे. त्यामुळे मिथके बनवण्याची प्रत्येक धर्माची पद्धत लक्षात घेतली तरच इतिहासाचे बिंदू हाती लागतात व इतिहासाचे मर्म आपल्याला समजावून घेता येते. त्यांना काही लोक भाकडकथा या सदरात टाकतात ते उचित नाही. इंद्राने विजय मिळवला अशा अर्थाची ऋचा येते तेव्हा याचा अर्थ खुद्द इंद्राने नव्हे तर इंद्राला मुख्य देवता मानणार्‍यांनी विजय मिळवला असा घ्यावा लागतो. तसेच देवासुरांची युद्धे पाहताना मिथके कोणती व प्रत्यक्ष घडली असलेली, तरीही मिथकांत आवेष्टित केली गेलेली युद्धे कोणती याचाही नीट धांडोळा घ्यावा लागतो.


मिथकांतून व पुरात्वीय पुराव्यांतून इतिहास उलगडतो असा. असूरांच्या दृष्टिने देव दुष्ट तर देवांच्या दृष्टिने असुर दुष्ट हे एक द्वंद्व होते हे समजावून घेणे गरजेचे आहे. त्याखेरीज आपल्याला आशियायी व म्हणूनच आपल्या सांस्कृतिक इतिहासाचा बोध नीटपणे होणार नाही.
- संजय सोनवणी