Friday, December 25, 2015

बदलायचे आहे कि नाही?


संजय सोनवणी (Sanjay Sonawani)


Posted: 24 Dec 2015 07:17 PM PST
आम्ही भारतीय पुराणपंथीय होतो आणि आहोत. आम्ही कधीच पुरोगामी नव्हतो. आम्ही धर्माशिवायही जीवन असू शकते हा चार्वाक, मस्खरी गोशालांदिचा विचार पुरातन कालातच अव्हेरला. आम्ही विश्वाचे निर्मिती कारण हे इश्वरी तत्वात नसुन विभिन्न भौतिक मुलतत्वांत आहे हा सांख्य विचारही कधीच फेटाळला. आमच्या पुर्वजांनी, त्यात सगळ्यांच जाती-जमाती व भारतात जन्मलेल्या धर्मांचे आले, धर्म, त्यांची कर्मकांडे, त्याला समर्थन देण्यात हवे तसे तत्वद्न्यान बनवत बसवण्यात आपली प्रतिभा खर्च केली. त्यावरच युक्तिवाद झडत राहिले. आम्हाला धर्ममार्तंडांनी नव्हे तर आमच्याच धर्मलालसेने धर्म-जातीगुलामीच्या बेड्यांत जखडले. त्या बेड्यांत असण्यातच आमची सुरक्षीतता होती कारण वैचारिक बंड करत समाजाला पुढे नेण्याची आमची मानसिक शक्तीच नव्हती.

आताही आम्ही तेच करत आहोत. आमच्या गतानुगतिकतेचे पातक आम्हाला कोणावर तरी फोडायचे असते. त्यासाठी कोणी मुस्लिमांना जबाबदार धरतो तर कोणी ख्रिस्त्यांना. कोणी ब्राह्मनांना तर कोणी बौद्धांना. पण मुळात ही सर्वच भारतियांची दांभिक आणि पराजित फसवेपनाच्या मानसिकतेचे एकुणातील फलित आहे यावर आम्ही कधी विचार करणार? आजही जर आम्ही "आम्हाला याने फसवले...त्याने घात केला" असे गळे काढत असू तर त्याचा एकमेव अर्थ असा होतो कि हा समाजच षंढांचा आहे.

जात्युच्छेदनाच्या चळवळी तर एक फार्स झाल्या आहेत. जातीअंत करायचा म्हणायचे आणि वक्त्यांच्या जाती जाहीरपणे सांगायच्या, कोणत्या जातींचे लोक जमलेत याचा उद्घोष करत टि-या बडवून घ्यायच्या. संघाचे लोकही असेच. आम्ही जातीपाती पाळत नाही म्हणतात आणि सर्वांच्या जातींची व्यवस्थित खबर ठेवतात. मंचावरुनही तसे उल्लेख करतात. जातीचे राजकारण नको असे मोठ्या तोंडाने लोक बोलतात आणि जातीच राजकारण करत आपल्याच जातीच्या नालायकांमागे ठाम उभे राहतात. महाराष्ट्रातून चळवळ मेली आहे हे मी ५ वर्षापुर्वीच घोषित केले होते. असल्या भाकड मनोवृत्तीचे नागरिक कसलीही सामाजिक चळवळ चालवू शकत नाहीत. यांना आजही जगण्यासाठी जातीचा आणि तिच्या खोट्या, वांझ अहंकारांचा व इतिहासाचा आधार लागतो. माणसाचे माणुसपण नेमके कशात आहे हे समजावून घेण्याची कुवत ज्या देशात नसते तो देश रसातळाला जाणार हे उघड आहे.

जाती तत्काळ नष्ट करता येत नाहीत तर किमान सर्व जातींना समान मानत त्यांचा सन्मान करायला काय हरकत आहे? प्रत्येक जात ही व्यवसायाने पडली आहे. प्रत्येकजातीने देशाच्या सांस्कृतिक व आर्थिक इतिहासात मोलाचे योगदान दिलेले आहे. या सर्वच जातींच्या सुकृतामुळे आज आम्ही येथवर आलो आहोत. आता परंपरागत जातींचे व्यवसाय नष्ट होत आलेत. पण जातीचे अहंकार का सुटत नाही? खिशात नाही आणा अन म्हणे बाजीराव म्हणा असला नपुंसक अभिमान काय कामाचा?

फुले-शाहू-आंबेडकरांचे नांव घेत जे चाललेय ते काही केल्या भुषणास्पद नाही. त्यांचे कार्य व विचार कणमात्रही पुढे नेता आले नाहीत कि त्यात भर घालता आलेली नाही. आजही सांस्कृतिक इतिहासाचे आकलन बालीश आहे. आजही तथाकथित चळवळीतले नेते "आर्य वंशीय बाहेरुनच आलेत." असे समजून त्यांच्या रणनित्या आखतात. समजा बाहेरुन आले तरी पाच हजार वर्षापुर्वी...एवढ्या जुन्या कालात्र समजा आले भारतात म्हटले तरी ते कोणत्या अंगाने परके/बाहेरचे राहतात याचा साधा विचार करायची अक्कल यांना कशी येत नाही?

संघवादी विद्वान हा तर वर्चस्वतावादाचा दांभिक व अज्ञानाचा कळस आहे. सिंधू संस्कृती वैदिक संस्कृती कशी यावर अचाट/बेफाट आणि कास्लेही अकलेचे तारे तोडत त्यांचे काम चालू असते. आता तर पुरातत्व विभागही त्यांच्याच अखत्यारीत असल्याने उद्या काय "चमत्कार" ते घडवून आणतील याचा नेम नाही. बामसेफ/ब्रिगेडच्या ब्राह्मण द्वेष्ट्या भुमिकेने ब्राह्मण संघटित होत परशुरामाला "हिरो" बनवत वांझ शड्डू ठोकतात. तेही द्वेषाची धार वाढवायचाच प्रयत्न करतात. सनातनवाल्यांचा आचरट धार्मिक आणि खुनशीपणा कशातून येतो? या सर्वांवर कठोर अंकुश समाजाच असला पाहिजे...पण तो कोठे आहे?

वास्तवपुर्ण, तथ्यपुर्ण दृष्टीने आम्हाला जीवनाकडे पहायला कोणी शिकवलेच नाही. वांझ हरलेल्यापणाच्या गाथा सांगत कोणाचा तरी द्वेष करणारे एकीकडे बेफाम आहेत तर दुसरीकडे संस्कृतीच्या प्राचीन वैदिकपणाच्या अचाट काल्पनिककथा सांगत बसणारे जोमात आहेत. यांना जातीजातीत सोडा, पोटजातींतही समता आणता आलेली नाही. हे काय वैचारिक आणि आर्थिक प्रगती साधणार? अशांचे भवितव्य कशाच्या ना कशाच्या गुलामीत राहणे हेच असते.

खोटे अहंकार बाळगत कोणीही बदलू शकत नाही. उद्याचे सूर्य यांना अप्राप्यच राहणार. माणसांचे मुडदे पडत राहणार. दुस-या जातीत लग्न केले म्हणून कोवळ्या पोरांचे छळ होतच राहणार...ठारही मारले जाणार. वाळीत टाकण्याची एक जुनी पद्धत होती, ती आताहे वेगवेगळ्या थरांत , अगदी वैचारिक - साहित्यिक क्षेत्रातही कटाक्षाने पाळली जाते. अघोषित बंद्या पालल्या जातात. हा समाज निघृण आहे हे वास्तव मान्य करत जे काही थोडके लोक उरलेत त्यांना नैराश्य येत तेही हार मानतील अथवा परिस्थितीशरण होतील असे वातावरण आहे.

बदलायचे आहे कि नाही? 
Posted: 24 Dec 2015 06:33 PM PST
इंद्रजीत कुलकर्णी व मेधा पाटील...
कोल्हापुरात अत्यंत निर्दयपणे मारले गेलेले प्रेमविवाहित दांपत्य. हे घृणास्पद कृत्य केले ते मुलीच्याच भावंडांनी. सख्ख्या बहिणीचा आणि मेव्हण्याचा गळा त्यांनी कसा चिरला असेल? कोठून येतो हा निर्दय पाशवीपणा? या भयानक हत्याकांडाची विशेष चर्चा महाराष्ट्रात झाली नाही. माझे मित्र प्रकाश पोळ यांनी लोकसत्तातून लिहिल्यामुळे वाहिनीवर चर्चा झाली. त्या चर्चेत माझे स्नेही प्रा. हरी नरके यांनीही महाराष्ट्रीय जातीयवादाचे मर्म उलगडून दाखवले. फेसबुकवर बोटचेप्या खंती आल्या पण त्यात यातील दाहकता समजण्याएवढा पाचपोच नव्हता. म्हणजेच जातीयवादाच्या केवढ्या गहन गर्तेत महाराष्ट्र सापडला आहे यावर मंथन (झालेच तर) करण्याची आवश्यकता आहे.
सांस्कृतिक/वैचारिक लढे, वादविवाद होत राहणे हे सुदृढ समाजाचे लक्षण म्हणता येईल, पण त्यात, असल्या वादांशी काडीइतकाही संबंध नसलेल्या, कोवळ्या जीवांच्या अजरामर प्रेमभावनेला, त्यांच्या सहजीवनाच्या स्वप्नांना अशा क्रूर पद्धतीने कायमचे नष्ट करु पाहणा-या विकृतींना स्थानच असू शकत नाही. दोषेंना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असल्या मागण्या ठीक आहेत. पण मुळात असल्या घटना घडणारच नाहीत यासाठी आपापल्या द्वेषबुद्ध्यांना नष्ट करणारी सामाजिक विचारधारा आम्हाला प्रभावशाली करता येत नसेल तर महाराष्ट्राचे धिंदवडे निघतच राहणार!
प्रकाश पोळांनी अत्यंत सत्य मांडलेय...मरणारा मुलगा ब्राह्मण होता म्हणून कथित पुरोगामी गप्प बसले काय? जी मुलगी मेली ती तर तशाच उच्च म्हणवल्या जाणा-या जातीतील...मारणारे तिचे सख्खे भाऊ. बहिणीने उच्च असो कि तथाकथित नीच जातीतील मुलाशी लग्न केलेच कसे या प्रश्नाने त्यांचा तिळपापड व्हावा व निर्दयतेने दोन हत्या व्हाव्यात आणि मरणारा मुलगा ब्राह्मण होता म्हणून हे तथाकथित पुरोगामी शांत बसले असतील तर मात्र या लोकांना "फुरोगामी" म्हणणारे निंदक, संघी, योग्यच आहेत असे म्हणावे लागेल. कारण त्यांची तीच लायकी आहे.
मी या हत्याकांडाचा तीव्र निषेध करतो.

No comments:

Post a Comment